Thursday, 14 December 2017

#kiff2017 दिवस पहिला : १४ डिसेंबर २०१७ : उद्घाटन, Opening Film : Northless (Mexico)

#kiff2017

● ६ वा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ ●



दिवस पहिला : १४ डिसेंबर २०१७.

(Opening show मेक्सिकन चित्रपट "northless" हा मेक्सिकोतून USA ला अवैधरित्या जाणाऱ्या Andress बद्दलचा जरासा सिरीयस ह्युमरस चित्रपट होता, त्याबद्दल लिहून लिंक नंतर शेअर करेन)

सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी "परदेस", "हिरो" , "राम - लखन" "कर्मा", "सौदागर" "ताल" इ. चित्रपटांचे दिग्दर्शक सुभाष घई प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावर्षीचा भालजी पेंढारकर पुरस्कार " दोघी ", " देवराई ", "वास्तुपुरुष", "एक कप च्या", "नितळ" , " संहिता","अस्तू", "कासव" चित्रपटांच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना मिळाला.

पहिल्यांदा सुमित्रा भावे सभागृहात आल्या आणि पुढं बसल्या. बहुधा कुणाच्या लक्षात आलं नाही. कारण एकतर त्यांचे सिनेमे जास्ती थेटरात लागत वैगेरे नाहीत, अस्तू च्या प्रदर्शनासाठी तर त्यांना वर्गणी जमा करावी लागली होती. आणि जरी चुकून कुणी थेटरात जाऊन पहिलाच (दुसरा ऑप्शन नसल्याने) तर खूपच संथ असल्यामुळे परत कधी त्या वाटेला गेलेला नसणार. बहुतेक यामुळे त्यांचं येणं कुणाच्या लक्षात आलं नाही.

नंतर सुभाष घई आले. सभागृहातील बहुतांशजण उभे राहून टाळ्या वाजवू लागले. मग फोटो घेतले गेले. त्यांनी प्रेक्षकांकडं पाहून हात केला आणि बसले.

नंतर औपचारिकता झाली.

सुभाष घई बोलायला उठले.
त्यांनी आजचं डिजिटल जनरेशन जुन्या जनरेशनच्या अनेकपटीन पुढं कसं आहे आणि ते स्वतः कसे जिवंत इतिहास झाले आहेत हे सांगितलं.
त्यांनी कोल्हापूरचा चित्रपट महोत्सव मोठा करण्यासाठी इथल्या लोकांनीच कसे प्रयत्न केले पाहिजेत हे युरोपातल्या फेस्टिव्हल्सचे चे दाखले देऊन सांगितलं. तसेच सरकारने मदत केली पाहिजे असं सांगितलं. नंतर त्यांनी चित्रपट हे फक्त मनोरंजन नसून जागरण/enlightenment असल्याचं सांगून त्यांनी सामाजिक इत्यादी संदेश पिक्चरच्या माध्यमातून कसे दिले ते (गीतेची शिकवण गोष्टीरूपातून त्यांना कशी समजली याचा दाखला देऊन) सांगितलं. त्यांनी त्यांचा चित्रपटातून भावंडांमधील नातं, पोलीस-गुन्हेगार, प्रेम इ. विषय कसे मांडले व ते व्यक्तिविकासासाठी कसे आवश्यक होतं ते सांगितलं.

सुमित्रा भावेंना पुरस्कार दिला.

त्या बोलायला उठल्या.
आवाज वयामुळं जरा कापत असला तरी खंबीर होता. त्यांनी पुरस्काराचा त्यांचे जवळजवळ सगळ्याच चित्रपटातील दिगदर्शक सुनील सुकथनकर, त्यांचे पाहिले छायाचित्रणकार आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने स्वीकार केला. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांच्या पदव्युत्तर पदव्या घेतल्यानंतर ग्रामीण महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करताना "बाई" हा लघुपट केल्याचं सांगितलं. त्यांचे सगळे चित्रपट सहसा तारे तारका नसणारे व खऱ्या माणसांबद्दल असल्याचे सांगितले. कासवसारखा चित्रपट त्या बनवत असताना हिंसा अनिवार्य असणाऱ्या चित्रपटांच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

बहुतांश कार्यक्रम सुभाष घई यांच्यावर केंद्रित होता. सुभाष घईंना शोमन बोललं जातं, कार्यक्रमातही दोनदा उल्लेख झाला. त्यांचे दिगदर्शीत व्यावसायिक चित्रपट खूप चांगले होते, मला अजून आवडतात. नोस्टॉजिक होतो अजूनही बघताना.

सुमित्रा भावे कार्यक्रमात सुरुवातीला लोकांच्या नजरेत आल्या नाहीत, कार्यक्रम झाल्यावर फोटो/सेल्फीज घेतले गेले. त्यांचे "एक कप च्या","नितळ","देवराई", "अस्तू","कासव" पाहिले आहेत. राहिलेले अजून पहायचेत. विचारांची साखळी अभिक्रिया निर्माण होते पाहिल्यावर, डोक्यातून जात नाहीत. आणखी एकदा पाहिल्यावर आणखी नवा पैलू उलगडतो. कासव मी पहिल्यांदा वेगळा इंटरप्रेट केला होता, नंतर त्याच्यावरचे लेख, सुनील सुकथनकारांची मुलाखत वाचल्यावर(किंवा मुलाखत youtube वर पहिली होती, नीटसं आठवत नाही) नव्या दृष्टीनं त्याचं interpretation झालं. अस्तु दोनदा पहिला, नितळ दोनदा पहिला.

सुभाष घईंचे सिनेमे मनोरंजन आणि नोस्टॉजिया म्हणून आवडतात.
सुमित्रा भावेंचे सिनेमे वेगळा दृष्टिकोन देणारे, विचारप्रक्रिया सुरू करणारे म्हणून नुसते आवडते नाहीत तर समृद्ध करणारे आहेत. म्हणून माझ्यासाठी तरी सुमित्रा भावे या कलाकार , दिग्दर्शक म्हणून नेहमीच मोठ्या आहेत. बऱ्याचदा टाळ्या मिळवणाऱ्या व्यक्तीसमोर विचार असणारी व्यक्ती लहान दाखवली जाते. तेव्हा विचार असणारी व्यक्ती "हॉवर्ड रोर्क" सारखी अविचल, स्थितप्रज्ञच राहते...

मला मात्र उगच वाईट वाटत राहतं.

- अभिजीत कदम.

No comments:

Post a Comment