Monday, 20 April 2020

"All art is autobiography"




#Road_to_Roma
#Roma
#Alfanso_Cuaŕon
"All art is autobiography" साने गुरुजींच्या साहित्याबद्दलचं पुस्तक वाचताना गेल्याच आठवड्यात या वाक्याला underline केलं होतं. आणि आज watchlist मध्ये आहे म्हणून रोमा पाहिला. त्यानंतर लगेच रोमावरील documentory "Road to Roma" पहिली. दिग्दर्शक Alfanso Cuaròn चा नॉस्टॅल्जिया आणि तत्कालीन मेक्सिको याबद्दलचा हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घरकाम करणारी cleo हिला मध्य मानून तिच्याभोवतीच्या परिघात व्यक्त होत जातो. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर चित्राच्या काही बाबी सुरुवातीला गडद पेन्सिलने ठळक काढाव्या आणि नंतर बोटानं हळुवार ठळक भागातील पेन्सिलचा रंग राहिलेलं चित्र पूर्ण करण्यासाठी वापरावा तसा चित्रपट आहे. चित्रपट पाहून लगेच हा माहितीपट आणि ते चित्र पूर्ण समजलं. चित्र कसं काढलं, ते तसंच का काढलं, ते काढताना त्यामागं कुठला विचार होता हे प्रत्यक्ष चित्रकार alfanso cuaron कडून ऐकणं आणि चित्र पूर्ण होण्याची प्रक्रिया अनुभवणं हे खूपच आनंददायक होतं. आपण प्रत्यक्ष चित्रपट पाहताना बऱ्याच गोष्टी चुकवतो (miss करतो) त्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून पुन्हा अनुभवता येतात. काही प्रसंग आणखी जास्त भिडतात, चित्रपटनिर्मिती प्रक्रियेबद्दलची आत्मीयता वाढते. एखादी कलाकृती पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर आपण मित्र-मैत्रिणींच्यात किंवा कुठल्यातरी अनौपचारिक व्यासपीठावर चर्चा करतो तेव्हा त्या कलाकृतीचा एखादा वेगळा पैलू आपल्याला नव्याने समजल्यावर खूप आनंद होतो. पण जेव्हा एखादा कलाकारच आपल्या कलाकृतीबद्दल अगदी मनापासून बोलतो तेव्हा ती कलाकृती आणखी सुंदर दिसते, अनेक नवे पैलू, जणू पूर्वी अदृश्य असल्यासारखे नव्याने दिसू लागतात. चित्रपट महोत्सवांदरम्यान अशी पर्वणी मिळते. तसाच अनुभव हा माहितीपट पाहिल्यावर आला. खरं तर तिला documentory किंवा माहितीपट असं रुक्ष नावही देऊ वाटत नाही, कारण एक कलाकार आपल्या कलाकृतीवर किती प्रेम करतो, तिचा आविष्कार त्याच्या मनात आहे तसा होण्यासाठी त्याची धडपड काय असते हे सांगणारी एखादी कथाच ती आहे असं मला वाटलं. बरेच कलाकार आपल्या कलाकृतीबद्दल बोलत नाहीत, किंवा त्यांना ती कलाकृती open to interpretation ठेवावी वाटते. तसं केल्याने एकतर प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून नवे पैलू समोर येण्याची शक्यता असते. नाहीतर ती कलाकृतीच तशी असते, कलाकाराच्या नकळत त्याच्या अंतर्मनातून किंवा सुप्त मनातून निर्माण झालेली. त्यामुळं काही कलाकार आपल्या कलाकृतीबद्दल बोलत नसावेत. पण इतर वेळी जेव्हा कलाकार आणि प्रेक्षक यांदरम्यान कुठल्याही माध्यमातून संवाद होतो किंवा कलाकार आपल्या कलाकृतीबद्दल व्यक्त होतो, तेव्हा ती प्रेक्षक किंवा कलारसिकासाठी पर्वणी असते. "Road to Roma" या माहितीपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक alfanso आपल्यापाशी व्यक्त होतो ही एक पर्वणीच असते. आपल्याशी बोलताना तो 'रोमा"बद्दल बोलतो, त्याच्या आठवणींबद्दल बोलतो आणि नकळत स्वतःशीही बोलतो. सिनेमा या माध्यमाबद्दल त्याचे विचार व्यक्त करतो, एखादा प्रसंग त्यानं तसाच का शूट केला, विशिष्ट camera movement च का वापरली, कलाकार कसे आणि तसेच का निवडले, एखादा प्रसंग आणि त्यातील कलाकारांच्या भावना नैसर्गिक येण्यासाठी त्याला काय करावं लागलं, "gravity" च्या वेळी त्याचा दिग्दर्शकीय दृष्टिकोन काय होता आणि "रोमा"च्या वेळी काय आहे, चित्रपटातील semiotics, "रोमा" चा त्याच्यावर दिग्दर्शक म्हणून पडलेला प्रभाव, एकंदरीत "सिनेमा" या माध्यमावरील त्याचं भाष्य या सगळ्या विषयांवर alfanso उत्स्फूर्तपणे व्यक्त होतो. म्हणून चित्रपटाबरोबरच हा माहितीपटही न चुकवण्यासारखा आहे.
- अभिजित कदम.






Saturday, 26 January 2019

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया! (भाग २)

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया! (भाग २)

- अभिजीत कदम.

आम्ही पुण्यात आलो. NFAI ला दहा दिवस चित्रपट रसग्रहण कार्यशाळा पूर्ण केली. आतापर्यंत फक्त नाव वाचलेल्या मृणाल सेन यांचा भुवन शोम पहिला, सत्यजित रे यांच्या apu triology मधील पथेर पांचाली पहिला. अनेक मान्यवरांची व्याख्यानं झाली. अनेक नव्या गोष्टी समजल्या, अनेक जुन्याच गोष्टी नव्याने समजल्या. राशोमोनचं screening काही कारणांनी रद्द झालेलं. किशोरदांनी राशोमोन-अकिरा कुरोसावा याबद्दल खूप सांगितलेलं, त्यामुळं खूप उत्सुकता होती, पण screening रद्द झाल्यानं वाईट वाटलं. पण मी कोल्हापूरला गेल्यावर पहिला राशोमोन मिळवून पहिला. किशोरदांनी बर्गमन यांच्याबद्दलही खूप सांगितलेलं. नंतर KIFF ला wild strawberries पाहायला मिळाला. NFAI च्या वर्कशॉपमधले लक्षात राहिलेले आणखी चित्रपट Bicycle Thieves, run lola run, the cup हे होते. Big city blues आणि आणखी एक शॉर्टफिल्म जिचं नाव आता आठवत नाही त्या लक्षात राहिल्या. अस्तू दुसऱ्यांदा पहिला, आणि कोर्ट तिसऱ्यांदा. चित्रपट पाहून झाल्यावर त्याबद्दल आत चर्चा व्हायची आणि बाहेर मी आणि किशोरदा , विषय फक्त सिनेमा. रात्री उशिरा NFAI पासून लकडी पुलाकडं चालत येत, आणि त्या पुलाच्या काठड्याजवळ उशिरापर्यंत सिनेमाबद्दल मारलेल्या गप्पा अजून आठवतात.

कार्यशाळेत डॉ. वनारसे मॅडम, गणेश मतकरी, सुषमा दातार मॅडम यांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. सिनेमाच्या प्रचंड प्रेमात असणारी सतीश जकातदार , सुधीर नांदगावकर अशी माणसं पहिली.
समारोपाला गोविंद निहलानी आले होते, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती, पण नाही जमलं. त्यांना समोर पाहता आलं, त्यांच्यासोबत फोटो काढला. मराठीतील माझा आवडता अभिनेता गिरीश कुलकर्णी समारोपाला आले होते. त्यांच्याशी मात्र आम्हाला बऱ्यापैकी बोलता आलं. "कथा दोन गणपतरावांची" मला खूप आवडला होता. आणि त्याचे दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्याशीही बोलता आलं. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर, डॉ. आगाशे यांच्यासोबत प्रश्नोत्तराच सेशन झालं अस्तूच्या screning नंतर. कोर्टमधील पब्लिक prosecutor ची भूमिका केलेल्या गीतांजली कुलकर्णी यांच्याशीही बोलणं झालं. या सगळ्यांमुळ ती कार्यशाळा कायम लक्षात राहीलच, पण त्या कार्यशाळेत एक वादळी व्याख्यान मात्र विशेषकरून आठवतं ते समर नाखातेंच. त्या एक-दीड तासाच्या सेक्शनमध्ये त्यांनी सिनेमा आणि एकंदरीत mass media कडं पाहायचा दृष्टिकोनच बदलून टाकला. सिनेमा आणि mass media समाजाला कसं नियंत्रित करतो याचा विचार कधीच केला नव्हता. अजूनही वेळ मिळाला तर त्यांची कार्यशाळा नक्की करणार आहे.






असे ते कार्यशाळेत दिवस प्रचंड भारलेले होते. ज्ञानदेव या माझ्या मित्राकड मी थांबलो होतो. सकाळी आवरून खांद्याला शबनम पिशवी अडकवून, अंगात नेहरुवजा शर्ट घालून मी निघायचो. तिथपासून झोपेपर्यंत डोक्यात आणि समोर फक्त सिनेमा, सिनेमा आणि सिनेमा होता.

कार्यशाळा ११ सप्टेंबरला संपली. १२ पासून राज्यसेवा mains होती. मी पहिल्या दिवशीचे भाषेचे पेपर दिले. पण डोक्यात फक्त आधीच्या एक आठवड्यातील सगळ्या गोष्टी फिरत होत्या. १३ सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी GS चे पेपर सुरू झाले. १३ ला माझा २५ वा जन्मदिवसही होता. मी GS १ चा पेपर दिला. परिक्षागृहात मी पेपर समोर धरून बसलो होतो. अभ्यास झाला नव्हताच आणि डोक्यात सारखे ते चित्रपट घुमत होते. अभ्यास न झाल्यानं वाईट वाटलं. मी दुसरा GS २ चा पेपर दिला नाही. तसाच रूमवर आलो. माझी शबनम पिशवी घेतली, ज्यात कार्यशाळेत खरेदी केलेली पुस्तकं होती. मी अप्पा बळवंत चौकात जाऊन आणखी एकदोन पुस्तक घेतली. मग बालगंधर्व कलादालनात कुठलतरी प्रदर्शन लागलेलं ते पाहिलं आणि बाहेर येऊन पाच साडेपाचपर्यंत पुस्तकं वाचत बसलो. "अर्धसत्य" ज्या मूळ कथेवरून बनवलेला होता ती श्री. दा. पानवलकरांची बहुतेक "सुर्या" ही कथाही त्यावेळी वाचल्याचं चांगलं आठवतंय. मग संध्याकाळी रूमवर आलो. आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला आलो.

त्यानंतर सलग तीन वर्षे मला राज्यसेवा पूर्व पास होता आलं नाही. दरम्यान आणखी भरपूर चित्रपट पाहून झाले. दरवर्षीचे KIFF झाले, नाट्यस्पर्धा झाल्या. पुण्यातल्या कार्यशाळेला जाण्याआधीच किशोरदांच BDO म्हणून selection झालं होतं. त्यांची सुरुवातीला रत्नागिरी आणि आता फलटणला posting झाली आणि मग परत "आली लहर केला कहर" असला कार्यक्रमही झाला नाही. KIFF साठी मला नवे जोडीदार मिळाले माझे दुसरे roommate रवीदा. कोल्हापुरातील राज्य नाट्य स्पर्धांची जवळजवळ सगळी नाटक मी, शिवराज, किरण, रवी, धीरज, अनिकेत, अनिरुद्ध सगळ्यांनी न चुकता पहिली. जवळजवळ प्रत्येक शनिवारचा release कोल्हापुरात मी मित्रांबर आणि कुणी नसेल तर एकट्याने पहिला.

दरवर्षी राज्यसेवेची जाहिरातही येत राहिली. जाहिरात आल्यावर न चुकता आणि मनापासून अभ्यास आणि परीक्षा देत राहिलो. पण एक अडचण प्रत्येकवेळी व्हायची. अभ्यास करताना एखाद्या गोष्टींबद्दलचं कुतुहल जागृत व्हायचं आणि मग त्या गोष्टीबद्दलच जास्तीत जास्त जाणून घ्यायला लागायचो आणि फिरून शेवट सिनेमात व्हायचा. म्हणजे दोन्ही एकमेकात मिसळून जायचं. मी २०१७ मध्ये "हिंदू" वाचायला घेतली. पहिली दोन-तीनच पानं वाचून झाली आणि मला जाणवलं की पाहिलं मी प्राचीन भारत नीट वाचला पाहीजे. दरम्यान राज्यसेवा पूर्वपरीक्षाही आली होतीच. मग मी जुन्या NCERT मधून प्राचीन भारत वाचायला सुरुवात केली. मग हडप्पा बद्दल आणखी वाचू वाटलं मग नव्या NCERT मधील तेवढी प्रकरण वाचली. आणि मग श्याम बेनेगल यांचे "भारत एक खोज" चे एपिसोड बघायला लागलो. यातच भरपूर वेळ गेला. बाकी विषयांना जास्त वेळ मिळाला नाही. परीक्षा पास होता आली नाही. गेल्यावर्षी "भारत एक खोज"चे राहिलेले सगळे episodes पाहिले आणि "हिंदू" वाचून पूर्ण केली. भारताच्या इतिहासात कालातीत भ्रमण करणाऱ्या आणि आदिम कृषिसंस्कृतीशी जोडलेली नाळ याची जाणीव निर्माण करणाऱ्या नेमाडेंच्या "हिंदू"साठी प्राचीन-मध्ययुगीन इतिहास माहीत असणं ही गरज होतीच. "हिंदु"बद्दलही लिहायचं आहेच, वर्तमानाच्या संदर्भात तर ती जास्तच प्रासंगिक आहे, पण त्याबद्दल नंतर लिहीन.

भारत एक खोज झाल्यानंतर "संविधान" संपवली. मग मात्र इतिहासातले काही चरित्रपट पाहिले. रिचर्ड अटेनबर्ग यांचा "गांधी", जब्बार पटेलांचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर" पहिला. वेद राही यांचा "वीर सावरकर" पहिला. श्याम बेनेगल यांची पंडित नेहरुंवरील "नेहरू" ही डॉक्युमेंटरी पहिली, त्यांचाच "नेताजी बोस : द फरगॉटन हिरो" पहिला. तरी केतन मेहतांचा "सरदार" आणि जिनांवरील ब्रिटिश चरित्रपट राहिलाच. एकंदरीत २०१८ हे वर्ष माझ्या ऐतिहासिक चित्रपट महोत्सवाचं वर्ष होतं.

डिसेंबर उजाडला. १० डिसेंबर २०१८, राज्यसेवेची जाहिरात आली. मी ऐतिहासिक चित्रपट महोत्सव थांबवला. अभ्यास परत सुरू झाला. १७ फेब्रुवारी ला पूर्वपरीक्षा आहे. मला अभ्यासात चालू घडामोडी अभ्यासायला जास्त आवडतात. बरीच नवी माहिती मिळते, नव्या गोष्टी समजतात.

काल ऑफिसवरून घरी आल्यावर जेवण झाल्यावर गणितं सोडवत बसलो होतो. नंतर सकाळची वार्षिकी वाचायला घेतली. आवडीचा (आणि प्रश्न येऊ शकणारा) व्यक्तिविशेष हा भाग वाचायला सुरू केला. आणि संतुरवादक पंडित उल्हास बापट यांच्याबद्दल वाचू लागलो. त्यात पुढील उल्लेख होते :
'या वाद्यावर त्यांनी "मिंड" किमया विकसित केली आणि अविरत संशोधनातून क्रोमॅटिक संतुरचा जन्म झाला.'
पुढं पंचमदांबरोबर "घर" चित्रपटापासून त्यांनी संतूर वाजवायला सुरुवात केल्याचा आणि "इजाजत", "जैत रे जैत", "१९४२ a love story" साठी त्यांनी संतूर वाजवल्याचं वाचलं.

मी पुस्तक बंद केलं आणि youtube वर पंडित उल्हास बापट search केलं. त्यांच्या एका कार्यक्रमाचा एक video मिळाला. तो पहिला आणि मी त्यात हरवून गेलो. त्यांनी शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत दोन्हीत काम केलंय. शास्त्रीय सांगितातले काही जाणकार सिनेमाच्या संगिताला कमी प्रतीचं मानतात तर इंडस्ट्रीतील काही लोक शास्त्रीय संगीताला महत्व देत नाहीत. पण दोन्ही महत्वाची आहेत असही ते सांगतात. त्यांनी मिंड म्हणजे काय ते वाजवून दाखवलं. त्या व्हिडिओत त्यांनी पंचमदांना मिंडच रेकॉर्डिंग ऐकवल्याचं आणि त्यांना ते खूप आवडल्याचं सांगितलं. "तुने ये कैसे किया?" असं विचारून याचा वापर आपण करू असं पंचमदा त्यांना म्हणाले. पंचमदांनी त्याचा वापर "मेरा कुछ समान" मध्ये केल्याचं समजलं. मेरा कुछ सामान मध्ये "...पतझड है कुछ...है ना" यानंतर वाजणारं संतूर, "होठो पे बीती बात आयी है...(अंगुर)" या गाण्यात दोन कडव्यांच्या मध्ये वाजणार संतूर. गाणं ऐकताना हात नकळत ज्या आवाजाबरं हवेत फिरायचा,ते वाजणारं काय होतं याचा कधी विचार केला नव्हता पण ते आवडायचं मात्र खूप. या दोन्ही आवडीच्या गाण्यातल्या नकळत आवडत्या जागा संतूरमुळं मला आवडत होत्या. हे सगळं ऐकून मी पुन्हा ती दोन्ही गाणी बारकाईनं ऐकली आणि त्या संतुरचा आनंद घेतला. पूर्वी ती गाणी ऐकताना शब्द ऐकण्यावर भर होता. उल्हास बापटांनी पंचमदांना अगदी "१९४२ a love story" पर्यंत साथ दिली. त्यातल्या गाण्यातही त्यांचंच संतूर आहे. ते अजून ऐकायचंय. "मेरा कुछ सामान.." तर फिरून फिरून कुठल्यातरी निमित्तानं समोर येतच राहत! गुलजार नावाचा माणूस पुन्हा पुन्हा भेटत राहतो.

खरं तर अभ्यासातही शिस्त पाहिजे. मी तेवढं वाचून पुढं जायला हवं होतं. पण तेवढ्या दोन परिच्छेदांवरून मी तास-दिडतास पंडित बापटांच्या संतुरमध्ये हरवून गेलो. मग भानावर आल्यावर मला जुनं सगळं आठवलं. पण जर मी तेवढा परिच्छेद वाचून पुढं गेलो असतो तर कदाचित माझा वेळ गेला नसता, आणखी वाचून झालं असतं. कदाचित हे दोन परिच्छेद वाचले त्यावर प्रश्न येणारही नाही. पण त्या गेलेल्या दीड तासाने मला खूप आनंद दिला, त्याची किंमत नाही होऊ शकत.

अणुबॉम्बमध्ये साखळी अभिक्रिया होऊन प्रचंड मोठा स्फोट होतो. ती अनियंत्रित साखळी अभिक्रिया असते. बाहेर पडणारे neutron आणि निर्माण होणारे तिप्पट neutron हे अनियंत्रित साखळी अभिक्रियेद्वारे क्षणार्धात मोठा स्फोट घडवून आणतात. वीजनिर्मितीसाठी वापरली जाणारी अणुऊर्जा मात्र नियंत्रित साखळी अभिक्रियेतून निर्माण होते. तिथं एक शिस्त असते. माझ्या MPSC च्या अभ्यासातून बाहेर पडणारे कुतूहलाचे कण मला चित्रपटांकडे नेतात आणि तिथून परत MPSC च्या अभ्यासाकडे आणतात. अशी साखळी अभिक्रिया कधीच सुरू झालीय. अनियंत्रित साखळी अभिक्रियेत लगेच होणारा स्फोट माझ्या बाबतीत लगेच होईल. वेळ सापेक्ष आहे. आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्षे म्हणजे interstellar मधील दुसऱ्या सूर्यमालेतल्या ग्रहावरील काही तास असतील. तिथल्या हिशेबान स्फोट पंधरा मिनिटं, अर्धा तास किंवा तासात होईलच. त्या स्फोटाने कुणाचं नुकसान मात्र होणार नाही. आनंद देणारा स्फोट असेल तो. तोपर्यंत MPSC च्या बाबतीत एकतर हवी ती post मिळेल नाहीतर परीक्षा देण्याचं वय संपेल. काहीतरी होईलच. सिनेमा आणि MPSC मुळं निर्माण झालेलं कुतूहल मात्र शेवटपर्यंत राहीलच.

पंडित उल्हास बापटांचा youtube वरील कार्यक्रम :

https://youtu.be/v45WeOwKk9I
https://youtu.be/Mqit4mp0Swo

(पूर्ण.)

- अभिजीत.

Friday, 25 January 2019

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया!

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया!

(पूर्वार्ध)

- अभिजीत कदम.


विजय तेंडुलकरांचं निधन झालं तेव्हा मी second year ला होतो. त्यावेळी रेक्टर ऑफिसच्या बाहेर बरेच पेपर असायचे. तें गेल्यानंतर तेव्हा पेपरभरून त्यांच्याबद्दल लेख आले होते. तोपर्यंत मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी त्यातले बरेच लेख वाचले. तेव्हा मला पहिल्यांदाच समांतर चित्रपट,सत्यदेव दुबे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, निशांत, अर्धसत्य, सामना, सिंहासन, उंबरठा, प्रायोगिक नाटकं, सखाराम बाईंडर इत्यादी सगळ्याची तोंडओळख झाली. मी सिनेमाच्या प्रेमात लहानपणापासून होतो. मला पारंपरिक सिनेमाची तर प्रचंड आवड होती, आहेच पण शूल, एक होता विदूषक असे चित्रपटसुद्धा लहानपणी मला आवडल्याच आठवतं. तेव्हा तेंडुलकरांबद्दलचे लेख वाचून माझं या नव्याने समजलेल्या गोष्टींबद्दलचं कुतुहल वाढलं. मग पुढे बऱ्याचदा ह्याच नावांची गाठ पडत राहिली, कारण मी पेपर वाचत राहिलो, आवड म्हणून, आणि MPSC च्या अभ्यासासाठी म्हणूनही.

२०११ ला कॉलेज झाल्यानंतर MPSC चा पूर्णवेळ अभ्यास सुरू झाला.
२०११ मध्येच मी STI च्या mains ची तयारी करत होतो. तेव्हा पेपरमध्ये मणी कौल यांच्यावर आलेला लेख वाचल्याचं आठवतंय. त्यांचं निधन झालं होतं. तेव्हाही परत आणखी नवी नावांची तोंडओळख झाली - मनी कौल, ऋत्विक घटक, मृणाल सेन. परीक्षेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले, ऑस्कर मिळालेले चित्रपट, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक इत्यादी गोष्टी अक्षरशः पाठ करत होतो. तेव्हा अशा यांत्रिक पाठांतराच वाईट वाटायचं, खूप इच्छा व्हायची ते चित्रपट पाहायची. पण एकतर तेव्हा अजून स्मार्टफोन,fast data, netflix, hotstar, amazon हे सगळं यायच होत आणि थिएटरला हे चित्रपट पाहायला मिळणं अशक्य होतं. पण तेव्हा अभ्यास करतानाच ठरवलं होतं जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा पहिला आतापर्यंत साचलेला चित्रपटांचा अनुशेष भरून काढायचा. तोपर्यंत अभ्यासाबरोबर सिनेमाबद्दलचे पेपरमध्ये येणारे बरेच लेख वाचून काढले. समांतर सिनेमा, कलात्मक सिनेमा, व्यावसायिक सिनेमा, मसालेदार सिनेमा यांबद्दल वाचून भरपूर झालेलं नोकरी लागेपर्यंत.

नोकरी लागल्यानंतर कोल्हापूरला आल्यावर पहिल्यांदा laptop घेतला. आणि अक्षरशः तुटून पडलो चित्रपटांवर. दरम्यान MPSC राज्यसेवेच्या नाममात्र परीक्षा दिल्या. कोल्हापुरात असताना श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, गुलजार, हृषीकेश मुखर्जी, जब्बार पटेल, सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर, गजेंद्र अहिरे, उमेश कुलकर्णी यांचे सलग चित्रपट dvds घेऊन लॅपटॉपवर पाहिले. म्हणजे त्या त्या दिगदर्शकांच्या चित्रपटांचे माझ्यापुरते फेस्टिव्हलच होते ते. बरोबरच प्रत्येक आठवड्याचे रिलिजेस, गोविंदा, सलमान, नाना पाटेकर, कमल हसन, लक्ष्मीकांत बेर्डे - अशोक सराफ आणि असे बरेच रूममधील वैयक्तिक - सामूहिक फिल्म फेस्टिवलही झाले.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (KIFF) तर श्याम बेनेगल, गजेंद्र अहिरे, सुमित्रा भावे सुनील सुकथनकर यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. गजेंद्र अहिरेंना, नाना पाटेकरांना त्यांचं पोर्ट्रेट बनवून भेट दिलं. ज्या लोकांचे चित्रपट मिळवून मी सलग बघत होतो, ज्यात हरवून गेलो होतो, त्या माणसांना प्रत्यक्षात भेटणं, त्यांच्याशी बोलणं यापेक्षा मोठा आनंद कुठला असू शकतो!





दरम्यान विजयकुमार गादेकर यांनी माझा english सिनेमाशी परिचय करून दिला होता. तोपर्यंत मला english सिनेमा हा titanic, MIB, जुरासिक पार्क, हॅरी पॉटर अशा ठारावीक फँटसी, सायन्स फिक्शन एव्हढ्यापुरताच माहीत होता. मग पहिल्यांदाच torentino ची ओळख झाली. मग मी माझा एकट्याचा torantino film festival उरकून घेतला. मग एकट्याचा Nolan film festival आणि मग Scorsese, David lynch, David Fincher यांचे सलग बरेच चित्रपट पाहिले. एकट्याचा चार्ली चॅप्लिन फेस्टिवल (richard Attenborough यांच्या चॅप्लिनसह) उरकला. इतरही बरेच single english चित्रपट पाहिले. माझ्या आवडीला माझे त्यावेळचे बॉस गुरव सर यांनीही प्रोत्साहन दिलं, त्यांनीही मला बरेच चित्रपट पाहायला सुचवले, माहिती दिली. अनुराग ने बरेच चित्रपट सुचवले. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळं (KIFF) जागतिक आणि प्रादेशिक सिनेमाचा परिचय झाला.

कोल्हापूरला माझ्यासारखाच एक पिच्चरवेडा माणूस, किशोरदा room mate म्हणून भेटले. या मित्रांमुळं, KIFF मुळं, एकंदरीतच कोल्हापूरमुळं सिनेमाबद्दल खूप काही कळलं, खूप चित्रपट पाहिले. या सिनेमाच्या कैफात एक शॉर्टफिल्मही लिहिली, बनवली. बोलण्यातही सिनेमाशिवाय विषय नसायचा. (अजूनही असतोच). कोल्हापूरमधील पहिली दोन वर्षे तर सिनेमानं अक्षरशः झपाटलेली वर्षं होती. आणि हो, दरम्यान कलामहर्षी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटीचा सभासद झालो होतो. त्यामुळं दर महिन्याला दोन जागतिक / भारतीय प्रादेशिक सिनेमे पाहायला मिळायचे ते वेगळंच.

२०१५ मध्ये किशोरदा रत्नागिरीवरून आणि मी कोल्हापूरवरून पुण्यात आलो, NFAI च्या १०व्या चित्रपट रसास्वाद शिबिरासाठी. ६ ते ११ सप्टेंबर २०१५ असं ६ दिवस ते शिबिर होतं. दरम्यान मी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर झालो होतो आणि मुख्य परीक्षा १२ ते १४ सप्टेंबर २०१५ ला होणार होती. परिक्षाकेंद्र होतं पुणे. आणि १३ सप्टेंबर २०१५, मी २५ वर्षांचा होणार होतो, माझा २५ वा वाढदिवस होता. सिनेमाच्या नादाला जास्त गेला की आयुष्यातही असलंच काहितरी फिल्मी होतं. तेव्हा २०१५ च्या सप्टेंबरमध्ये काय झालं ते उद्या लिहितो. आणि आज अचानक हे सगळं का लिहू वाटलं याबद्दलही उद्याच सांगतो. .... 

Saturday, 4 August 2018

आठवणींच्या पलीकडं... Beyond Memories...( Eternal Sunshine of the Spotless Mind)

आठवणींच्या पलीकडं... Beyond Memories...( Eternal Sunshine of the Spotless Mind)
- अभिजीत कदम.



तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटता, मग पुन्हा पुन्हा भेटता, एकमेकांबद्दल आवड निर्माण होते...मनं गुंतत जातात, मग तुम्ही प्रेमात पडता. या सगळ्यात काही खूप अमूल्य क्षण असतात, जेव्हा तुमचा हात तिच्या / त्याच्या हातात असतो, तुम्ही एका शांत ठिकाणी आपल्या स्पेशल व्यक्तीबर असता, अत्यंत भारलेला क्षण असतो, असं वाटतं की पूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदूच आहे तो क्षण, असा क्षण, जेव्हा तुम्हाला वाटतं की यानंतर मृत्यू आला तरी चालेल. तो क्षण निघून जातो. तुम्ही दोघंही असे क्षण अनुभवत, आठवणी निर्माण करत पुढं जात असता.... मग काहीतरी बिघडू लागतं. तो/ती possesive झालेत अस तुम्हाला वाटू लागतं. छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागतात. नेहमीच होत जातात या गोष्टी....कधी कधी प्रश्न सुटतात. पण कधीकधी हे इतकं वाढत जातं की तुम्हाला त्याचा / तीचा राग येऊ लागतो, नकोसे होतात ते....असह्य होतं सगळं.

असं फक्त तो आणि तिच्या बाबतच घडत नाही, तर वेगवेगळ्या परिस्थितीत होतं. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नको वाटू लागते, पण आपण त्या व्यक्तीला सोडूही शकत नाही, कारण आपण आपल्याला माहिती असतं की आपल्याला आठवणी जगून देणार नाहीत, ते अमूल्य क्षण सारखे छळत राहणार...

... पण जर फक्त एखादी व्यक्ती आणि फक्त तिच्यासोबतच्या आणि तिच्या सगळ्या आठवणीच स्मृतीतून काढून टाकता आल्या तर??? कुठल्याशा दवाखान्यात अशी memory erase करता आली तर??

या चित्रपटाचा पटकथालेखक चार्ली कौफमनने ही कल्पना कशी सुचली याचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे. (मुलाखतीची link खाली दिली आहे.)
या सिनेमाचा दिग्दर्शक मिशेल आणि त्याचा मित्र बिस्मथ एकदा असेच बोलत असताना या प्रश्नापाशी येऊन थांबले. त्या दोघांनी एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं. त्यांनी लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या नावे पत्र पाठवायची ठरवली. ज्यांना पत्र पाठवणार होते त्यांना उद्देशून असं लिहिण्यात येणार होतं की "तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मेंदूमधून फक्त तुमची स्मृती कायमची पुसली गेली आहे, बाकी सगळ्या स्मृती तशाच आहेत." त्यांना असं करून लोकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या होत्या. प्रत्यक्षात हा प्रयोग त्यांनी केला नाही. मात्र नंतर मिशेलने पटकथालेखक चार्लीला या चर्चेबद्दल सांगितलं, आणि चार्ली म्हणाला की यावर एक relationships बद्दल चित्रपट होऊ शकतो आणि चार्लीने पटकथा लिहिली. वाचताना जरी दोन ओळीत वाचून झालं असलं तरी प्रत्यक्षात चित्रपट तयार व्हायला मात्र बरेच दिवस गेले.


सिनेमात जिम कॅरी ने जोएल साकारलाय तर केट विंसलेटने क्लेमेंटाईन साकारलीय. भिन्न स्वभावाची दोघ रिलेशनशिपमध्ये असतात, पण वर सांगितल्यासारखा दुरावा खूप वाढतो, आणि त्यात क्लेमेंटाईन भावनेवर निर्णय घेणारी, लहरी असते. ती भावनेच्या भरात जोएलच्या स्मृती पुसन टाकते. तशी सोय एका क्लानिकमध्ये उपलब्ध असते. मग त्या क्लीनिकमधून आलेलं एक पत्र जोएलला मिळतं ( जसं पत्र मिशेल लोकांना पाठवून प्रयोग करणार होते. )
" क्लेमेंटाईन च्या स्मृतींमधून जॉइलच्या स्मृती पुसून टाकण्यात आल्या आहेत. कृपया त्यांच्या नात्याबद्दल तिला काही सांगू नये ". जोएलला वाद मिटवून नवी सुरुवात करायची असते, हे पत्र हातात पडल्यावर तो तडक तिच्याकडं जातो तर खरच ती त्याला ओळखतंच नाही. व्हॅलेंटाईन डे थोड्या दिवसांवर आलेला असतो. त्याला त्यापूर्वी रिलेशन पहिल्यासारख करायचं असतं. पण हे सगळं झाल्यावर हो हतबल होतो. आणि मग तोसुद्धा ही प्रक्रिया करून क्लेमेंटाईनला त्याच्या स्मृतींमधून पुसून टाकण्याचा विचार करतो आणि त्या डॉक्टरला ती प्रक्रिया करण्यासाठी भेटतो. काही काळानं त्याच्यावर प्रक्रिया सुरु होते. त्याच्या मेंदूवर चाललेल्या प्रक्रियेदरम्यान त्याला भूल देऊन झोपवलेलं असतं, आणि सिनेमाचा पुढचा बराच भाग त्याच्या सबकॉन्शसमध्ये घडतो. मग तो त्याच्याच स्मृतींमध्ये जातो ज्या स्मृतींमध्ये क्लेमेटाईन असते, आणि उलट्या क्रमाने एकेक आठवणीत जातो, आणि ती आठवण पुसली जाते, मग आणखी पूर्वीच्या आठवणीत. अशी तिच्या आठवणी पुसायची प्रक्रिया सुरू होते. सुरुवातीला त्याचा गोंधळ होतो कारण तो घडून गेलेल्या घटना पुन्हा अनुभवू लागतो, जागा असल्यासारखा! सबकॉन्शसमध्ये असताना, जुन्या आठवणी जगताना मग त्याला कळून चुकतं की जे घडतंय ते खरं नाहीय, त्याच्या मनात चाललंय, आणि त्याच्या आठवणी पुसल्या जात आहेत. तो जसजसा तिच्यासोबतच्या जुन्या आठवणी जगू लागतो तसं त्याला कळून चुकतं की आपण अजूनसुद्धा खूप प्रेम करतो हिच्यावर... आता मात्र त्याला खूप पश्चाताप होतो, पण कितीही प्रयत्न केले तरी त्याला जाग येत नाही, तो सबकॉन्शसमधून बाहेर पडू शकत नाही, आणि त्यांच्या आठवणी नष्ट व्हायची प्रक्रिया सुरूच राहते. मग तो त्याच्या मनात क्लेमेटाईनला खोलवर लपवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तिची आठवण पुसली जाणार नाही. तो त्यासाठी अशा आठवणीही निवडतो, ज्या आठवणी आपल्याला माहिती असूनही आपण कधी त्यांची आठवण काढत नाही. काही अत्यंत कटू आठवणी, किंवा अशा आठवणी ज्यात आपण लाजिरवाण्या प्रसंगातून गेलेलो असतो. तो अशासाठी तिला अशा आठवणींमध्ये घेऊन जातो जेणेकरून तिची आठवण मनात खोलवर पुरून ठेवता येईल आणि तिची आठवण डॉक्टरना पुसता येणार नाही. तो तिची स्मृती वाचवून ठेऊ शकतो का? आणि पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहा!

हे सरळ सांगितलेलं असलं तरी चित्रपट मात्र सरळ पुढं जात नाही. narrative आणि editing नॉन linear आहे, तसंच मनात घडत असलेले प्रसंग surreal आहेत. पण चित्रपटात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं आपण कुठला प्रसंग वर्तमानात घडतोय आणि कुठला प्रसंग आधी घडून गेलेला आहे हे समजतं. आधी सांगितल्याप्रमाण क्लेमेंटाईन लहरी, मनात जे आलं ते लगेच करणारी, आणि सिनेमात म्हटल्याप्रमाणे impulsive असते. ती तिच्या केसांना वेगवेगळे color करत असते. चित्रपट पाहत असताना सुरुवातीपासूनच जर तिच्या केसांचे color मधील बदल नीट पाहिले, तर chronology समजू शकते. चित्रपटात काही प्रसंग पुन्हा घडताना दिसतात. कधी कधी संभ्रम निर्माण होतो तेव्हा असे बारकावे लक्षात घेतले तर लगेच समजतं की तो प्रसंग कधी आणि कुठं घडलाय. हा चित्रपट येण्याआधी 2000 मध्ये अशाच स्मृती नष्ट होण्यावर आणि narrative व editing नॉन linear असणारा memento येऊन गेलेला होता. चार्ली दुसऱ्या प्रोजेक्टस मध्ये गुंतलेला असल्यानं त्याला पटकथा लिहून पूर्ण करायला खूप वेळ गेलेला आणि या दरम्यानच memento येऊन गेला. सगळीकडं त्याची चर्चा सुरू होती. यामुळं निराश होऊन चार्ली चित्रपट सोडून देण्याच्या विचारात होता. पण त्याला समजावून त्याच काम पूर्ण करायला लावलं गेलं. त्यानं चित्रपट लिहून पूर्ण केला. Eternal Sunshine ला 2004 चा सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा वर्गातील Academy Award (Oscar) मिळाला.
हा चित्रपट स्मृती नष्ट होण्यावर आणि narrative व editing नॉन linear असणारा असला तरी यात आणि memento मध्ये याशिवाय कुठलंच साम्य नाही. यात memento च्या contrast मध्ये सिलेक्टिव्ह मेमरी लॉस आहे.

पूर्वी मी जिम कॅरीचे dumb and dumber आणि the mask पाहिले होते. दोन्हीतला जिम खूप energetic होता, dumb मध्ये खूप बडबड्या आणि धुडगूस घालणारा होता. या चित्रपटात मात्र जिम खूप introvert, शांत serious आहे. तो त्याच्या एका डायरीत (जी नेहमी त्याच्यासोबत असते ) चित्रं रेखाटत असतो, लिहीत असतो. जिमचा अभिनय खूपच उत्कट आणि realistic वाटतो. Wiki वरील पेजवर सांगितल्यानुसार शूट सुरू होण्यापूर्वी एक वर्ष जिमचा ब्रेकअप झाला होता. जिम आणि मिशेलचा एक interview youtube वर आहे. त्यात जिम म्हणतो की त्याच्यासाठी हा चित्रपट एक भावनिक प्रवास होता, त्याला चित्रपट करताना भूतकाळाची परीक्षेला परत बसल्यासारखं वाटलं. चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यात जोएल स्मृती नष्ट करणाऱ्या डॉक्टरला त्याच्या कॅलेंमेटाईनसोबतच्या सगळ्या आठवणी सांगत असतो, आणि पुढच्या प्रक्रियेसाठी डॉक्टर ते सगळं टेपमध्ये रेकॉर्ड करत असतो. जिम youtube वरील त्या मुलाखतीत पुढं सांगतो की तो या प्रसंगासाठी, improvise करण्यासाठी पुन्हा त्याच्या भूतकाळाला सामोरं गेला. त्यानं त्याच्या ex च नाव न घेता त्याच्या भूतकाळाबद्दल टेपमध्ये रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्डिंग शूटिंग दरम्यान सगळे ऐकत असत, त्यातून काही inputs मिळण्यासाठी. जिमच्या त्या मुलाखतीत / making video मध्ये असच एकदा त्याचं खरं रेकॉर्डिंग ऐकतानाच शूटिंग आहे. त्यात जिम केटला त्याच रेकॉर्डिंग ऐकवत आहे, ऐकताना तो अचानक टेप थांबवतो आणि उचलून फेकून देतो. मग त्याचा बांध सुटतो आणि तो रडताना दिसतो, आणि केट त्याला सांभाळताना. या सगळ्या गोष्टींमुळ असेल किंवा नसेल, पण जिमचा अभिनय खूपच खरा वाटतो, भिडतो.
केटच पात्र खूपच उत्साही, लहरी, अल्लड, बिनधास्त आहे, कधी कधी तिला पाहताना जब वी मेट मधील गीत आठवते. तिनंही खुप सुंदर काम केलंय. केटचे पूर्वीचे सिनेमे बहुतेककरून Period - historic असे होते. हा सिनेमा आणि पात्र तिच्यासाठीही वेगळे होते. जोएलच्या शांत पात्राच्या विरुद्ध तिचं बडबडी पात्र गती, उत्साह आणतं.

सिनेमाचा soundtrack सुद्धा खूप सुंदर आहे. काही प्रसंग संगीतामुळं मनाला भिडतात. आणखी एक trivial तरीही interesting गोष्ट म्हणजे एका प्रसंग आहे ज्यात क्लेमेंटाईन जोएलला घरी बोलावते. ते गप्पा मारत ड्रिंक घेत असताना पार्श्वभूमीला मंद आवाजात हिंदी गाणी ऐकू येतात. पहिल्यांदा "तेरे संग प्यार मे..." मग " मेरा मन तेरा प्यासा..", आणि शेवटी "वादा ना तोड..!"

बरीच दृश्यं ही मनातील-आठवणीतील-सबकॉन्शसमधील असल्यानं surreal आहेत त्यामुळं खुप मजेशीर आणि चमत्कारिक आहेत. स्मृती पुसण्याची प्रक्रिया चालू असल्यानं आपण ज्या आठवणीचं दृश्य पाहतो त्यातील वस्तू - property किंवा सिनेमाच्या भाषेत ज्याला mise en scène म्हणतात त्यातील एकेक गोष्ट गायब होत जाते किंवा रूपांतरित होत जाते आणि शेवटी त्या आठवणीतून क्लेमेंटाईन गायब होते, म्हणजेच पुसली जाते. मग पुढच्या आठवणींवर प्रक्रिया. तिच्या आठवणी पुसण्याचा क्रम हा अगदी ताजी आठवण पहिल्यांदा पुसण्यापासून होतो आणि मग पूर्वीच्या आठवणींकडं सरकत जातो. मिशेलने बरेच surreal प्रसंग आर्टिफिशल स्पेशल इफेक्ट न वापरता चित्रित केलेत. काही दृश्यं पाहतानाच आश्चर्य वाटतं की हे कसं केलं असेल. याबद्दलही जिम आणि मिशेलच्या मुलाखतीत/making व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे, ते प्रसंग कसे शूट केले ते दाखवलं आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.

चित्रपटाचं नाव हे एका Elosia to Abelard या इंग्रजी दीर्घकवितेतील आहे. त्या कवितेत एक quote आहे, त्या quote चा उल्लेख सिनेमातही एका उपकथानकात येतो.

"How happy is the blameless vestal's lot!
The world forgetting, by the world forgot.
Eternal sunshine of the spotless mind!
Each pray'r accepted, and each wish resign'd"

त्या मूळच्या इंग्रजी कवितेतली मुलगी तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या शिक्षकाच्या प्रेमात पडते, ते दोघ लग्न करतात पण ते लग्न समाजमान्य नसल्यानं त्यांना वेगळं व्हावं लागतं. तो शिक्षक, Abelard हा monk बनतो आणि ती nun बनते. परत बऱ्याच काळानं तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं तेव्हा ती दोघ एकमेकांना पत्र पाठवतात. पण त्यांना कळून चुकतं की दोघांचे विचार आता जुळत नाहीत. हे समजल्यावर ती खूप दुःखी होते आणि पूर्ण आयुष्य एकटं जगायचं ठरवते. मग ती nun बनून राहात निरपेक्ष एकांत जीवन जगते. या ओळींची अनेक interpretations आहेत, त्यातल्या एकानुसार असं निरपेक्ष निरिच्छ आयुष्य जगतानाच्या तिच्या आयुष्याबद्दल या ओळी बोलतात. मूळ कवितेच्या या विषयावर चित्रपटातही एक tragic उपकथानक आहे.

या कवितेची सिनेमाच्या संदर्भातही बरीच वेगवेगळी interpretations मी काही वेबसाईट्सवर वाचली, पहिली. एका interpretation नुसार भूतकाळ, त्रास देणाऱ्या आठवणी विसारल्यावर निरपेक्ष मनाला मिळालेल्या आनंदासाठी Eternal sunshine of the spotless mind हे title वापरलं आहे. तर आणखी एका ठिकाणी blameless vestal हा शब्द जोएल आणि क्लेमेटाईनच्या रिलेशनशिपमधील नावीन्य असणाऱ्या सुरुवातीच्या निष्पाप, भारलेल्या phase साठी वापरला आहे आणि रिलेशनशिपमधील सुरुवातीची phase जशी कुठल्याही प्रश्नांशिवाय-वादरहित असते, त्या काळातील नातं हे बहरलेलं असतं. दोघांच्या मनातही एकमेकांबद्दल कुठला किंतु नसतो, शंका, चीड नसते, त्यासाठी Spotless Mind म्हटलंय.

असो, आणखीही वेगळे, सुंदर अर्थ निघतील. याचं आणखी वेगळं interpretation असेल तर मलाही सांगा.

एकंदरीत कधी कधी रिलेशनशिपमध्ये एक वेळ येते, आपल्याला वाटतं,

"तार्रुफ़ (ओळख) रोग हो जाये तो
उसको भूलना बेहतर
ताल्लुक (नातं) बोझ बन जाये तो
उसको तोड़ना अच्छा...
चलो एक बार फिर से,
अजनबी बन जाये हम दोनो..."

तेव्हा आपल्या स्मृती नष्ट तर नाहीत करता येत, पण आपण break up चा विचार करतो. पण वेगळं होऊन जर तुम्हाला
"एक सौ सोला चांद कि रातें,
एक तुम्हारे कांधे का तिल,
गीली मेंहदी कि खुशबू,
झुठ-मूठ के शिकवे कुछ,
झूठ-मूठ के वादे भी सब..." हे सगळं आठवणीत येऊन त्रास देणार असेल तर पुन्हा एकदा विचार करा.


कोल्हापूरमधील रविवारची एक निवांत सकाळ होती. बाहेर पाऊस पडत होता. मी घरी एकटाच होतो, आणि रविवारच्या पावसामुळं अंगातून आळस जात नव्हता. तेव्हा मी अंथरुणात निवांत बसून "eternal sunshune.." पाहिला. एकदा पहिला आणि मग लगेच सलग दुसऱ्यांदा पाहिला. आवडला तर अफाटच होता, आणि काही missing links सुद्धा होत्या. दुसऱ्यांदा पाहताना बऱ्याच नव्या गोष्टी दिसल्या, समजल्या ज्या माझ्या आधी लक्षात आल्या नव्हत्या. चारच्या सुमारास मी मोबाईल बाजूला ठेवला. त्यातले काही sountrack youtube वर मिळालेले ते ऐकत बसलो. बाहेर थोडी झिरझिर सुरू होती. मग त्या बारीक झिरझिरीत बाहेर जाऊन चहा पिऊन आलो. पूर्ण दिवस आणि पुढचे तीन-चार दिवस मी त्याच mood मध्ये होतो. नंतर आणखी दोनदा पहिला, त्याबद्दल वाचलं, ऐकलं, पाहिलं. I just love it!

Netflix वर उपलब्ध आहेच, आणखी कुठले स्रोत असतील तिथून घेऊन पहा. पाहणार असाल तर हेडफोन लाऊन आणि मध्येच न थांबता पहा. कदाचित पहिल्यांदा पाहिल्या पाहिल्या बऱ्याच जणांना समजेल, कदाचित नाही. आवडला पण पूर्ण समजला नसेल तर परत नक्की पहा, नक्की समजेल आणि नवीन काहीतरी गवसेल.

- अभिजित कदम.

• चार्ली कौफमनची मुलाखत : https://youtu.be/3vhsStpeKfE
• जिम कॅरी आणि मिशेल चा मेकिंग चा व्हिडीओ : https://youtu.be/r3ok1W-8Ds8
• चार्ली आणि मिशेलची मुलाखत : https://www.dvdtalk.com/interviews/charlie_kaufman.html

Friday, 15 December 2017

#kiff दुसरा दिवस : ३ चित्रपट आणि राजदत्तजी.

#kiff2017

● Day 2

#KolhapurInternationalFilmFestival2017

शाहू स्मारकला एक सभागृह आहे,  १ कलादालन आणि २ हॉल आहेत. स्मारक, कलादालन आणि एक हॉल खाली तर दुसरा हॉल वरच्या मजल्यावर आहे. कलादालनात बाबुराव पेंटारांच्या चित्रपटातील छायाचित्रांचे प्रदर्शन आहे.

 सभागृह, खालचा हॉल आणि वरचा हॉल अशा ३ स्क्रीन्स आहेत.

स्मारकात येताना गेटवर kiff चा चौकटी बोर्ड आहे,  सभागृहाच्या बाहेरच्या जागेचा चांगला वापर करून सभागृहात जाण्यासाठी एन्ट्री तयार केली आहे. त्या एन्ट्रीच्या वर खूप छान लिहिलंय

"Enlighten your world"



हे वाचून उगाच लय भारी वाटतं 😃.

* * *

हे झालं बाहेरच्या वतावरणाबद्दल. उद्या याबद्दल आणखी सांगेन. आता मुख्य विषय. आज ३ चित्रपट पाहिले :

( चित्रपटांबद्दल जे लिहिलंय ते परीक्षण तर अजिबातच नाही,  प्रत्येकजण चित्रपटाबद्दल असाच विचार करेल असंही नाही. ही माझी वैयक्तिक मतं आहेत आणि मला ज्या चित्रपटाबद्दल लिहावंसं वाटलं त्याबद्दलच लिहिलंय. )

1. सर्वनाम,२०१७ (मराठी : गिरीश मोहिते) : मायमराठी कॉम्पिटिशन.

2. The Prophecy 2015 (Vietnam : Vuyong duc) : segment-CC-COUNTRY FOCUS.

3. The House of the 41st street 2017 (Iran : हमीद घोरबानी) : segment - World Cinema.

★ सर्वनाम
गूढत्वामार्गे अध्यात्मिक विषयाकडे जाणारा होता. मंगेश देसाईचा अभिनय खूप आवडला. कथा चांगली होती. फक्त एक पात्र कृत्रिम वाटलं, त्याचे संवाद कृत्रिम वाटले. जास्त काही लिहावंसं वाटल नाही.

■ सर्वनाम पाहून बाहेर पडताना "सर्जा", "अरे संसार संसार", "भालु","मुंबईचा फौजदार", "माफीचा साक्षीदार" ,"माझं घर माझा संसार" इ. मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक राजदत्तजी बाहेर पडताना दिसले. (शांतपणे चित्रपट पाहता यावा म्हणून मी सुरुवातीच्या तिसऱ्या row ला बसलो होतो. बऱ्यापैकी सगळे माग बसले होते.म्हणून बाहेर पडताना मी शेवटी राहिलो आणि राजदत्तजी दिसले !). कुणी ओळखलं नसावं त्यांना. एकटेच गर्दीच्या मागून बाहेर चालले होते. त्यांना फोटो काढू का विचारलं. खूप छान हसले आणि हो म्हणाले. मग सेल्फी काढला.

मग ते पुढं गेले. मी तेवढ्यात सॅकमधून डायरी काढली. त्यांच्या जवळ गेलो त्यांनी माझ्याकडं पाहिलं. मी डायडी समोर केली. पुन्हा छान हसले आणि सही दिली.




★ The Prophecy
व्हिएतनामच्या फ्रांसविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची कथा आहे आणि mostly हा "हो ची मिन्ह" यांचा चरित्रपट होता.
व्हिएतनामच्या घनदाट जंगलातुन प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेल्या लढ्याची कथा. जवळजवळ संपूर्ण चित्रपट या जंगलातच शूट केलाय. चित्रपटात मला एकंदरीत patriotic फीलिंग जाणवली.

एक quote आणि एक संवादाबद्दल लिहावंसं वाटतं.

हो ची मिन्ह सहकाऱ्यांबरच्या बैठकीत माओ झेडांगच एक वाक्य बोलतात "Politics is a war without blood and war is politics with blood"

एका प्रसंगात एक पत्रकार जंगलात हो ची मिन्ह यांची मुलाखत घ्यायला येतो. तो विचारतो "तुम्ही communist आहात की nationalist ?"
मिन्ह शांत असतात. उभे राहुन क्षणभर शांतच राहतात. पत्रकार पुन्हा विचारतो, "तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही..."
तेव्हा ते उत्तरतात, "या प्रश्नाचं उत्तर खूप मोठंही आहे आणि खूप लहानही. मी लहान उत्तर देतो. मी patriot आहे."

एकंदरीत चांगला चरित्रपट वाटला मला.

★ The House of the 41st street
आज सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट. इराणमधील एका शहरातल्या 41st स्ट्रीट वरच्या एका घरातली कथा.

सुरुवातीला एक दुकान दिसतं, मग तिथं दोघांजणात हिश्श्यावरून आणि कर्जावरून भांडण सुरू होतं. या शॉटला समांतर शॉटमध्ये एक वयस्कर बाई रस्त्यावरून घाईत पळताना दिसते. ते दोघे (मोहसीन आणि मॉर्तेझा नावाचे भाऊ असतात ) सुरुवातीला भांडत असतात, मग दोघेही हायपर झालेले दिसतात, मग एकमेकाला ढकलाढकलीत दोघे फ्रेममध्ये डावीकडे अंधारात जातात.
Cut to :  ती वयस्कर बाई आता त्या दुकानाबाहेर आलीय. बाहेर पोलीस आहेत, गर्दी झालीय, लोक काय चाललंय ते बघताहेत. ती त्या दोघांची आई आहे म्हटल्यावर पोलीस तिला आत सोडतात. मग दुसरी एक बाई , एक माणूस आणि एक मुलगा येतात. त्या भांडणात मॉर्तेझाचा मोहसीनच्या हातून खून होतो आणि मोहसीन पळून जातो. ती दुसरी  बाई मॉर्तेझाची पत्नी फॉरेघा असते, तो माणूस फॉरेघाचा भाऊ आणि तो मुलगा मॉर्तेझ-फॉरेघाचा मुलगा असतो.

भांडणात मोहसीनकडून मॉर्तेझाच्या खुनानंतर सगळं बदलतं. 41st street वरील त्या तीन मजली इमारतीत खालच्या मजल्यावर दोघा भावांची वयस्कर आई राहत असते. मध्ये मोहसीनची बायको हमीदा आणि गोड मुलगी सनम राहत असतात, तर सगळ्यात वर आता फक्त मॉर्तेझाची बायको फोरोघ आणि १२ वर्षांचा मुलगा(नाव आठवत नाहीय) राहत असतात.

मुलाला महितेय की त्याच्या चुलत्याने त्याच्या वडिलांचा खून केलाय, त्यामुळं तो खूप बदललाय. तो त्याच्या लहान चुलत बहिणीशी, सनमशी आता पहिल्यासारखा बोलत नाही. त्यामुळं ती निरागसपणे आईला विचारते तो माझ्याशी का नाही बोलत?मी बाबांशी कट्टी केली तर बोलेल का तो माझ्याशी? तिच्या आईला तिच्या टॅब्लेटमध्ये गेम्स अपलोड करता येत नाहीत, ती त्याच्याकडं जाते पण तो गेम्स देत नाही. तिची आई टॅबलेट गेम्स शिकायचा प्रयत्न करते, तेव्हा सनम आईला म्हणते तुला दादासारखी (नाव आठवत नाही म्हणून दादा) नाही जमत गेम.

इराणी कायद्यानुसार मोहसीनला शिक्षा देण्यात मॉर्तेझाच्या पत्नीच्या मताचा काहीच विचार होत नाही. एकतर त्या दोघांची वयस्कर आई मोहसीनला फाशी द्यावी असं सांगू शकते किंवा मॉर्तेझाचा मुलगा legal age ला आल्यावर (आणखी दोन वर्षांनी) एकतर चुलते मोहसीनला शिक्षा देण्याबद्दल सांगू शकतो किंवा blood money (भुर्दंड) मागून चुलत्याची शिक्षा रद्द करू शकतो.

एका सीनमध्ये दोन भावांची आई दोन्ही मुलांच्या बायकांना एकत्र बोलावते, मोहसीनबद्दल काय निर्णय घ्यायचा विचारायला. फिरोघा नवरा मेल्याचं दुःख आहे,तिचा मुलगा अनाथ झाला आहे त्यामुळे मोहसीनला शिक्षाच झाली पाहिजे असं सांगते. तर हमीदा लहान मुलीला आताच शाळेत खुन्याची मुलगी म्हणून हिनवल जातंय, ती आताच वडिलांबद्दल वाईट विचार करतेय, तिला आयुष्यभर याच दुःखात नाही मोठं करायचं अस सांगते आणि तिचं दुःख मोठं असल्याचं सांगते. तेव्हा ती म्हातारी म्हणते " मला तर दोन्हीही दुःख आहेत, मुलगा मेल्याचं आणि दुसऱ्या मुलाला होणाऱ्या शिक्षेचंही." [ अंगावर काटा येतो ऐकून.]
मग म्हातारी निर्णय मॉर्तेझाच्या मुलावर सोपवते, आणखी दोन वर्षांनी तोच ठरवेल अस म्हणते.

मोहसीनला खूप पश्चाताप झालेला असतो, होत असतो , आईच्या सांगण्यावरून तो पोलिसात हजर होतो, हमीदा त्याला जामिनावर सोडवते. तो भाड्याच्या खोलीत दुसरीकडं राहतो. त्याला भावाच्या मुलाला भेटावं वाटत, खूप पश्चाताप होत असतो, पण मॉर्तेझाच्या मुलाला त्याला भेटायची इच्छा नसते आणि त्याच्या चुलत्याला जामीन मिळाल्याचं त्याला कुणी सांगतही नाही.

शेवटच्या सीनमध्ये मॉर्तेझाचा मुलगा आईबरोबर ते घर सोडून दुसरीकडं राहायला जाण्यासाठी गाडीत साहित्य शिफ्ट करत असतात. तेव्हा न राहवून मोहसिन तिथं येतो आणि त्यांना घर सोडून जाऊ देत नाही. मॉर्तेझाच्या मुलाला चुलता आल्याच दिसल्यावर त्याचा तोल जातो तो खूप आक्रदंत चुलत्याला लहान हातांनी मारत राहतो. चुलता त्याला मिठी मारत शांत करण्याचा प्रयत्न करत राहतो. [त्याचा तो आक्रोश खूप टोचतो पाहताना.  डोळ्यातून पाणी येत. ] कॅमेरा त्या दोघांवरून माग येतो, घराच्या बाहेर बॅग्ज वरून त्या तीनमजली घरावर अन मग बाहेर येतो, गेट दिसतं, तिथून कंपाउंडच्या भिंतीवरुन उजवीकड जात राहतो आणि "41st street" या पाटीवर येऊन थांबतो. Still frame.

नावं पडतात.

सभागृहातली (पहिली स्क्रीन) लाइट लागते. सभागृहात मोजकेच असणाऱ्यातले काही लोक लाईट लागली आणि नावं पडू लागली तरी जरावेळ त्या आक्रोशातच गुंतलेले बसून असतात. मग मी बाहेर येतो. त्याच स्क्रीनला वेगळ्या ठिकाणी बसलेल्या मित्रांना भेटतो. पाचेक मिनीटं त्या चित्रपटाबद्दल बोलतो आणि निघतो. डोक्यात तसाच चित्रपट साचलेला....व्यक्त होण्यासाठी आतुर.

मी घरी यायला निघतो. बाहेर एक वाक्य दिसतं.

" The sad moment when you return to your boring and ordinary life after watching an awesome movie "


-अभिजीत कदम.

Thursday, 14 December 2017

#kiff2017 दिवस पहिला : १४ डिसेंबर २०१७ : उद्घाटन, Opening Film : Northless (Mexico)

#kiff2017

● ६ वा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ ●



दिवस पहिला : १४ डिसेंबर २०१७.

(Opening show मेक्सिकन चित्रपट "northless" हा मेक्सिकोतून USA ला अवैधरित्या जाणाऱ्या Andress बद्दलचा जरासा सिरीयस ह्युमरस चित्रपट होता, त्याबद्दल लिहून लिंक नंतर शेअर करेन)

सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी "परदेस", "हिरो" , "राम - लखन" "कर्मा", "सौदागर" "ताल" इ. चित्रपटांचे दिग्दर्शक सुभाष घई प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावर्षीचा भालजी पेंढारकर पुरस्कार " दोघी ", " देवराई ", "वास्तुपुरुष", "एक कप च्या", "नितळ" , " संहिता","अस्तू", "कासव" चित्रपटांच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना मिळाला.

पहिल्यांदा सुमित्रा भावे सभागृहात आल्या आणि पुढं बसल्या. बहुधा कुणाच्या लक्षात आलं नाही. कारण एकतर त्यांचे सिनेमे जास्ती थेटरात लागत वैगेरे नाहीत, अस्तू च्या प्रदर्शनासाठी तर त्यांना वर्गणी जमा करावी लागली होती. आणि जरी चुकून कुणी थेटरात जाऊन पहिलाच (दुसरा ऑप्शन नसल्याने) तर खूपच संथ असल्यामुळे परत कधी त्या वाटेला गेलेला नसणार. बहुतेक यामुळे त्यांचं येणं कुणाच्या लक्षात आलं नाही.

नंतर सुभाष घई आले. सभागृहातील बहुतांशजण उभे राहून टाळ्या वाजवू लागले. मग फोटो घेतले गेले. त्यांनी प्रेक्षकांकडं पाहून हात केला आणि बसले.

नंतर औपचारिकता झाली.

सुभाष घई बोलायला उठले.
त्यांनी आजचं डिजिटल जनरेशन जुन्या जनरेशनच्या अनेकपटीन पुढं कसं आहे आणि ते स्वतः कसे जिवंत इतिहास झाले आहेत हे सांगितलं.
त्यांनी कोल्हापूरचा चित्रपट महोत्सव मोठा करण्यासाठी इथल्या लोकांनीच कसे प्रयत्न केले पाहिजेत हे युरोपातल्या फेस्टिव्हल्सचे चे दाखले देऊन सांगितलं. तसेच सरकारने मदत केली पाहिजे असं सांगितलं. नंतर त्यांनी चित्रपट हे फक्त मनोरंजन नसून जागरण/enlightenment असल्याचं सांगून त्यांनी सामाजिक इत्यादी संदेश पिक्चरच्या माध्यमातून कसे दिले ते (गीतेची शिकवण गोष्टीरूपातून त्यांना कशी समजली याचा दाखला देऊन) सांगितलं. त्यांनी त्यांचा चित्रपटातून भावंडांमधील नातं, पोलीस-गुन्हेगार, प्रेम इ. विषय कसे मांडले व ते व्यक्तिविकासासाठी कसे आवश्यक होतं ते सांगितलं.

सुमित्रा भावेंना पुरस्कार दिला.

त्या बोलायला उठल्या.
आवाज वयामुळं जरा कापत असला तरी खंबीर होता. त्यांनी पुरस्काराचा त्यांचे जवळजवळ सगळ्याच चित्रपटातील दिगदर्शक सुनील सुकथनकर, त्यांचे पाहिले छायाचित्रणकार आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने स्वीकार केला. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांच्या पदव्युत्तर पदव्या घेतल्यानंतर ग्रामीण महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करताना "बाई" हा लघुपट केल्याचं सांगितलं. त्यांचे सगळे चित्रपट सहसा तारे तारका नसणारे व खऱ्या माणसांबद्दल असल्याचे सांगितले. कासवसारखा चित्रपट त्या बनवत असताना हिंसा अनिवार्य असणाऱ्या चित्रपटांच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

बहुतांश कार्यक्रम सुभाष घई यांच्यावर केंद्रित होता. सुभाष घईंना शोमन बोललं जातं, कार्यक्रमातही दोनदा उल्लेख झाला. त्यांचे दिगदर्शीत व्यावसायिक चित्रपट खूप चांगले होते, मला अजून आवडतात. नोस्टॉजिक होतो अजूनही बघताना.

सुमित्रा भावे कार्यक्रमात सुरुवातीला लोकांच्या नजरेत आल्या नाहीत, कार्यक्रम झाल्यावर फोटो/सेल्फीज घेतले गेले. त्यांचे "एक कप च्या","नितळ","देवराई", "अस्तू","कासव" पाहिले आहेत. राहिलेले अजून पहायचेत. विचारांची साखळी अभिक्रिया निर्माण होते पाहिल्यावर, डोक्यातून जात नाहीत. आणखी एकदा पाहिल्यावर आणखी नवा पैलू उलगडतो. कासव मी पहिल्यांदा वेगळा इंटरप्रेट केला होता, नंतर त्याच्यावरचे लेख, सुनील सुकथनकारांची मुलाखत वाचल्यावर(किंवा मुलाखत youtube वर पहिली होती, नीटसं आठवत नाही) नव्या दृष्टीनं त्याचं interpretation झालं. अस्तु दोनदा पहिला, नितळ दोनदा पहिला.

सुभाष घईंचे सिनेमे मनोरंजन आणि नोस्टॉजिया म्हणून आवडतात.
सुमित्रा भावेंचे सिनेमे वेगळा दृष्टिकोन देणारे, विचारप्रक्रिया सुरू करणारे म्हणून नुसते आवडते नाहीत तर समृद्ध करणारे आहेत. म्हणून माझ्यासाठी तरी सुमित्रा भावे या कलाकार , दिग्दर्शक म्हणून नेहमीच मोठ्या आहेत. बऱ्याचदा टाळ्या मिळवणाऱ्या व्यक्तीसमोर विचार असणारी व्यक्ती लहान दाखवली जाते. तेव्हा विचार असणारी व्यक्ती "हॉवर्ड रोर्क" सारखी अविचल, स्थितप्रज्ञच राहते...

मला मात्र उगच वाईट वाटत राहतं.

- अभिजीत कदम.